Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Acts Chapters

Acts 27 Verses

Bible Versions

Books

Acts Chapters

Acts 27 Verses

1 जेव्हा आम्ही समुद्रमार्गे इटलीला जाण्याचे ठरविले तेव्हा पौल व इतर काही कैद्यांना युल्य नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले. युल्य हा सम्राटाच्या सेनेतील एक अधिकारी होता.
2 अद्रमुतिय येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो. हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते. आम्ही या जहाजातून प्रवासाला निघालो. तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथे राहणारा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.
3 दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोन नगराला पोहोंचलो. युल्य पौलाशी फार चांगला वागला. पौलाच्या मित्राना त्याची काळजी घेता यावी म्हणून त्याने मोकळीक दिली.
4 तेथून आम्ही समुद्रमार्गे पुढे निघालो. आणि कुप्रच्या किनाऱ्याकिनाऱ्याने निघालो कारण वारा समोरचा होता.
5 किलकिया व पंफुल्याजवळच्या समुद्राला पार करुन लुक्या प्रांतातील मुर्या बंदरात पोहोंचलो.
6 तेथे शताधिपतीला इटलीला जाणारे आलेक्झांद्रीयाचे एक जहाज आढळले. त्याने आम्हांला त्या जहजात बसविले.
7 आम्ही बरेच दिवस हळूहळू प्रवास करीत होतो. कनिदा येथपर्यंत येण्यासाठी आम्हांला फार कष्ट पडले कारण वारा तोंडचा होता. आम्हांला पुढे जाता येईना. म्हणून आम्ही क्रेताच्या दक्षिणेकडून सलमोनाच्या समोरच्या बाजूस गेलो.
8 यापुढे आमचे जहाज क्रेतच्या किनाऱ्याने मोठ्या अडचणींतून सुरक्षित बंदर येथे पोहोंचले, तेथे जवळच लसया नगर होते.
9 बराच वेळ वाया गेला होता. आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते. कारण एव्हाना यहूद्यांच्या उपासाचा काळहीनिघून गेला होता. तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला. पौल म्हणला,
10 “पुरुषांनो, मला वाटते, आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल!”
11 परंतु पौलाच्या मताशी जहाजाचा कप्तान व मालक सहमत झाले नाहीत, उलट जहाजाच्या कप्तानाच्या व मालकाच्या बोलण्यावरच शताधिपतीचा जास्त विश्वास होता.
12 परंतु हे बंदर (सुरक्षित म्हटलेले) हिवाळ्यात मुक्काम करायला सोईचे नव्हते. म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले. आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले. (फेनिके हे क्रेत बेटावरील शहर होते. त्याचे बंदर नैऋ त्य व वायव्य दिशेला होते.)
13 जेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले, तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याकिनाऱ्याने तारु हाकारीत जाऊ लागले. जहाजावरच्या लोकांना वाटू लागले की, अशाच प्रकारचे वारे आम्हांला पाहिजे होते. व तसेच ते वाहत आहे.
14 परंतु लवकरच क्रेत बेटावरुन ‘ईशान्येचे’ म्हटलेले वादळी वारे वाहू लागले.
15 आणि जहाज वादळी वाऱ्यात सापडले, व त्याला पुढे जाता येईना. तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न सोडून आम्ही वाऱ्याने जहाज भरकटू दिले.
16 मग कौदा नावाच्या लहानशा बेटाच्या किनाऱ्याकिनाऱ्याने आम्ही जाऊ लागलो. मग थोड्या खटपटीनंतर जीवनरक्षक होडी वर उचलून घेतली.
17 जीवन रक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले. जहाज वाळू असलेल्या सूर्तीनावाच्या उथळ जागी आदळेल या भीतीने त्यांनी शीड खाली काढले. तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले.
18 जोरदार वादळी वाऱ्याचे तडाखे खावे लागल्याने लोकांनी दुसऱ्या दिवशी जहाजावरील सामान बाहेर टाकून दिले.
19 तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हातांनी बाहेर काढून टाकली.
20 बरेच दिवस आम्हांला सूर्य किंवा तारे दिसले नाहीत. वादळ फारच भयंकर होते. आम्ही आमच्या सर्व आशा सोडून दिल्या. आम्ही मरणार असे आम्हांला वाटू लागले.
21 बराच काळपर्यंत लोकांनी अन्नपाणी घेतले नव्हते. मग पौल त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “गुहस्थांनो, क्रेतावरुन मुक्काम हलवू नका, हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता. म्हणजे हा त्रास व ही हानि तुम्हांला टाळता आली असती. पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंति आहे.
22 कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोंचणार नाही. आपले जहाज मात्र गमवावे लागेल.
23 मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची भक्ति मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला.
24 आणि तो दूत म्हणाला, ‘पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे. तुझ्याबरोबर प्रवास करणारे जे लोक आहेत, त्यांच्या जीवाचे रक्षण करण्याचे वचन देवाने मला दिले आहे.’
25 तेव्हा गुहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा! कारण मला जसे दूताने सांगितले, अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे.
26 परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरुन थांबावे लागले.”
27 चौदाव्या रात्री आमचे जहाज अद्रिया समुद्रातून चालले होते, तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोंचले असावे असा अंदाज केला.
28 त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती वीस वाव भरली. आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती पंधरा वाव भरली.
29 ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीति वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची वाट पाहू लागले.
30 खलाशांनी जहाजातून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकल्याचे भासवून जीवनरक्षक होड्या समुद्रात टाकल्या.
31 परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, “जर हे लोक जहाजात राहणार नाहीत, तर तुम्ही वाचणार नाही.”
32 यावर शिपायांनी जीवनरक्षक होड्यांचे दोर कापून टाकले. आणि त्या खाली पाण्यात पडू दिल्या.
33 पहाट होण्याअगोदर पौलाने त्या सर्वांना काहीतरी खाण्याचा आग्रह केला. तो म्हणाला, “आज चौदावा दिवस आहे. तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात पण खाणेपिणे काही केले नाही. अन्नाचा कणही खाल्ला नाही.
34 तुम्ही थोडे तरी खा. कारण तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्ही खाणे जरुरीचे आहे. तुम्ही खावे अशी मी तुम्हांला विनंति करतो. तुमच्यापैकी कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही.”
35 असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले, ती भाकर मोडून तो खाऊ लागला.
36 ते पाहून त्या सर्वांना धीर आला आणि ते जेवले.
37 आम्ही सर्व मिळून जहाजात दोनशे शाहातर लोक होतो.
38 त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्यायलयांनंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला.
39 दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही. परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली. म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरविले.
40 म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले. त्याचबरोबर सुकाणूंच्या दोऱ्या एकत्र केल्या. नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे शीङ वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले.
41 परंतु दोन समुद्रांमधील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले. तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला.
42 तेव्हा शिपायांनी कैद्यांना मारण्याचे ठरविले. यासाठी की त्यांच्यातील कोणी पोहोत जाऊन पळू नये.
43 परंतु शतधिपतीला पौलाला वाचवायचे होते म्हणून त्याने शिपायांना तो विचार सोडून देण्यास सांगितले. आणि ज्यांना पोहता येत असेल त्यांनी जहाजातून उड्या टाकून किनाऱ्याला जावे अशी आज्ञा केली.
44 बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले. अशा रीतीने जहाजातील सर्व जण सुखरुपपणे भूमीवर पोहोंचले.

Acts 27:3 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×