तेव्हा इस्राएल लोक नदी ओलांडून येईपर्यंत परमेश्वराने यार्देनचे पात्र कोरडे ठेवले ही हकीकत यार्देनच्या पश्चिमेकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी तसेच भूमध्य समुद्राजवळील सर्व कनानी राजांनी ऐकली. आणि भीतीने त्यांचा थरकाप उडाला. त्यानंतर इस्राएल लोकांचा सामना करण्याचे धैर्य त्यांच्यात उरले नाही.
(4-7) यहोशवाने त्यांची सुंता करण्याचे कारण असे ; इस्राएल लोकांनी मिसर सोडले तेव्हा सर्व लढवय्या पुरूषांची सुंता झालेली होती. वाळवंटात असताना यापैकी बऱ्याच जणांनी परमेश्वराचे ऐकले नाही. तेव्हा धांन्याने संपन्न असा हा देश या लोकांना पाहायला मिळणार नाही असे परमेश्वराने शपथपूर्वक सांगितले हा देश आपल्याला देण्याचे परमेश्वराने आपल्या पूर्वजांना वचन दिले होते. पण या लोकांमुळे परमेश्वराने सर्वांना या वाळवंटात चाळीस वर्षे रखडवले. या काळात ही माणसे मरून जावीत म्हणूव अशा प्रकारे त्या लढण्यास पात्र अशा माणसांचा त्या काळात मृत्यू झाला आणि त्यांच्या मुलांनी त्यांची जागा घेतली. पण त्या प्रवासात, वाळवंटात जन्मलेल्या मुलांपैकी कोणाचीच सुंता झाली नव्हती म्हणून यहोशवाने हे काम केले.
तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तुम्ही मिसरमध्ये गुलाम होतात. आणि या गोष्टीची तुम्हाला लाज वाटत असे. पण आज मी हा कलंक धुवून काढला आहे.” म्हणून यहोशवाने त्या जागेचे नामकरण “गिलगाल’ असे केले. आजही गिलगाल म्हणूनच तो भाग ओळखला जातो.
दुसऱ्या दिवसापासून स्वर्गातील खास अन्न म्हणजेच मान्ना येणे बंद झाले. कनानातील भूमीत पिकलेले अन्न लोकांनी खाल्ल्यानंतर हे झाले त्यावेळेपासून इस्राएलांना स्वर्गातील खास अन्न मिळाले नाही.
यरीहोजवळ असताना यहोशवाने समोर पाहिले तर एक माणूस पुढे उभा असलेला त्याला दिसला. त्या माणसाच्या हातात तलवार होती. यहोशवाने पुढे होऊन त्याला विचारले, “तू आमच्या बाजूचा आहेस की शत्रूच्या गोटातील?”
त्यावर तो उत्तरला, “मी तुमचा शत्रू नव्हे. परमेश्वराच्या सैन्याचा सेनापती या नात्याने नुकताच येथे तुझ्यासमोर आलो आहे.”यावर यहोशवाने त्याला जमिनीवर डोके टेकवून आदरपूर्वक अभिवादन केले आणि विचारले, “स्वामीची काय आज्ञा आहे? मी आपला सेवक आहे.”